पूर्वीच्या काळी चुलीसमोर खाली बसून स्वयंपाक केला जाई. दररोज संपूर्ण अंगाला तैल लावून गरम पाण्याने स्नान केले जाई. मासिक पाळीवेळी बाहेर बसून शरीर व मन यांना संपूर्ण विश्रान्ति मिळत असे, त्यासहच दूध तूप यांची आवड असून शारीरिक कष्ट देखील होत असत. त्याचा परिणाम म्हणून आयुर्वेदीय स्नेहन – स्वेदन वातशमन होऊन पर्यायाने कंबर, पाठ, मान, गुडघेदुखी कमी दिसे या उलट सध्याचे जीवन आढळते. अंगाला तेल लागत नाही. साबणाने त्वचा रुक्ष बनत जाते. घोडयासारखे उभे राहून पुढे झुकून गॅसवर स्वयंपाक केला जातो. बाळंतपणात शेक शेगडी नाही,चित्र विचित्र बाहेरील अन्न खाण्याने वजन वाढलेली याचा परिणाम म्हणून वेरीकोस वेन्स, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी यात भर पडली आहे. त्यातच पंख्याचा सततचा वारा, ए.सी., एअर कुलर ,सततचा प्रवास, यामुळे वात प्रकोप होऊन अस्थि, संधी, मांस, स्नायु इत्यादीची दुखणी वाढली आहेत.
मांसगत वात, सिरागत वात, मधुमेह, सततची होणारी गळवे, जुनाट संग्रहणी, कोम्बाची आणि रक्ताची मुळव्याध, फिशर, मुतखडा, पित्ताश्मरी, मणक्याचा टी. बी., कॅल्शिअमची कमतरता, पांडुरोग, मूर्दुस, माती खाणे, रक्ताल्पता, स्थौल्य, अति व्यायाम, अति मैथुन, अति रुक्ष पदार्थ खाणे, जागरण करणे, चुकीच्या पध्दतीने झोपणे-बसणे-उठणे, दिवसा झोपणे, अंथरूणाचा आकार बदलणे, दंश, अन्नातील विषार, व्यायामाचा अभाव, जुनाट ताप, आघात, रजप्रवृत्तीच्या विकृती, श्वेत प्रदर, गर्भाशयाचे आजार, मलाशयाचे आजार, गर्भाशय मूत्राशय खाली सरकणे, कॅन्सर, वृक्क विकृती, पोट फार सुटणे, गर्भाशय, मणक्याचा जन्मजात विकृती व नंतर आलेल्या विकृती, मणक्यात घेतलेली इंजेक्टिव इत्यादी अनंत कारणांचा कंबरदुखी साठी विचार करावा लागतो.
अग्निकर्म (सुवर्ण शलाका ), जलौकावचरण, बस्ति, पाठ बांधणे, स्नेहन, स्वेदन आणि पोटीस बांधणे यांचा पोटातील औषधांसह साकल्याने उपयोग केल्यास काही अपवाद वगळता सर्व प्रकारची कंबरदुखी आयुर्वेदाने थांबते.
अस्थिंची झीज थांबणे, मांस पेशींना बळकटी येणे, स्नायूबंध कणखर होणे, कुर्चा तरुणास्थितील सूज, संकोच कमी होणे, मज्जातंतू वरील दबाव कमी होणे, पोटातील हायड्रोलिक आणि न्युम्याटीक दाब प्राकृत होणे, रक्ताची शुद्धी होणे, आणि वाताचे शमन होणे इतक्या विविध प्रकाराने गुण येतो.
रोगाच्या मूळ कारणाकडे दुर्लक्ष करुन केवळ बाह्य लक्षणांवर उपचार करण्याऐवजी रोगाचे समूळ उच्चाटन करण्यावर आयुर्वेद भर देतो. म्हणूनच आयुर्वेद हे आजार कायमचा बरा करुन व रोगप्रतिकारशक्ती सुधारून संपुर्ण व दीर्घकाळ स्वास्थ्य प्रदान करणारे शास्त्र आहे. मनुष्य दररोज संध्याकाळी, उत्तररात्री, वर्षा ऋतूत, ग्रीष्म ऋतूत थोडा थोडा म्हातारा होत जातो कारण शरीरातील वात दोष वाढत जातो त्यासाठी प्रत्येकाने निदान पुढील गोष्टी करून तरुणपण टिकवावे आणि वाताचे आजार टाळावेत.
- आयुर्वेदिक दिनचर्या ऋतुचर्या रात्रीचर्या पाळणे.
- दररोज सर्वांगाला औषधी सिद्ध तेल लावणे.
- दर १५ दिवसांनी पोट साफ करण्याचे औषध घ्यावे.
- वसंत ऋतूत वमन, शरद ऋतूत विरेचन, वर्षा ऋतूत बस्ति असे पंचकर्म करावेत.
- निरनिराळ्या प्रकारे अवयवांना शेक दयावा.
- वेदना व आजारांची मूळ कारणे शोधून उपचार करणे.