गर्भधारणा शक्य आहे – आयुर्वेदात आहे शारीरिक आणि मानसिक दोन्ही उपचारांचा नैसर्गिक मार्ग!

PCOS, अनियमित पाळी आणि गर्भधारणा समस्या, वंध्यत्वावर आयुर्वेदिक उपचार – डॉ. हर्षल नेमाडे

आयुर्वेदीय दृष्टिकोनातून स्त्री वंध्यत्व: कारणे, उपचार आणि जीवनशैली

स्त्री वंध्यत्व ही आजच्या काळात एक गंभीर आणि वाढती समस्या आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे, तणावपूर्ण दैनंदिन जीवन, अपथ्यकर आहार, आणि पर्यावरणीय घटकांमुळे या समस्येचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. आयुर्वेद, प्राचीन भारतीय वैद्यकशास्त्र, या समस्येवर नैसर्गिक आणि शाश्वत उपाय प्रदान करते. यामध्ये शारीरिक आणि मानसिक संतुलन साधण्यासाठी आहार, विहार, आणि औषधींचा समावेश आहे.

स्त्री वंध्यत्वाची कारणे

स्त्री वंध्यत्व म्हणजे गर्भधारण करण्यास असमर्थता. यामागे अनेक कारणे असू शकतात, ज्यामुळे शुक्र आणि रज यांच्यात विकृती निर्माण होते. आयुर्वेदानुसार, गर्भधारणेसाठी चार मुख्य घटक आवश्यक आहेत: ऋतु, क्षेत्र, अंबु, आणि बीज. यापैकी कोणत्याही घटकात दोष निर्माण झाल्यास गर्भधारणा होणे कठीण होते.

आयुर्वेदानुसार वंध्यत्वाची कारणे

  • बदललेली जीवनशैली: अनियमित आहार, व्यायामाचा अभाव, सतत बसणे, आणि रात्री जागरण यामुळे शरीरातील दोषांचे संतुलन बिघडते.
  • मानसिक ताणतणाव: तणाव, चिंता, आणि नकारात्मक विचारांचा थेट परिणाम मासिक रज:स्त्राव आणि स्त्रीबीज निर्मितीवर होतो.
  • अपथ्यकर आहार: शिळे, तेलकट, आणि प्रक्रिया केलेले अन्न, तसेच पापड, चायनीज पदार्थ यांसारखे विदाही आहार शरीरातील अग्नीला कमजोर करतात.
  • पर्यावरणीय घटक: मोबाइल आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांमुळे निर्माण होणाऱ्या विद्युतचुंबकीय लहरींचा संपर्क.
  • ऋतुचर्या आणि दिनचर्येचे पालन न करणे: मासिक पाळीच्या काळात विशिष्ट नियमांचे पालन न करणे.
  • वाढते वय: वय वाढत गेल्याने स्त्रीबीज निर्मितीची क्षमता कमी होते.
  • संप्रेरक असंतुलन: इस्ट्रोजिन, प्रोजेस्टेरॉन, आणि प्रोलॅक्टिन यांसारख्या संप्रेरकांचे असंतुलन.
  • वैद्यकीय कारणे: पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम (PCOS), गर्भाशयातील ग्रंथी, बीजवाहिनी अवरोध, आणि एंडोमेट्रिओसिस यांसारख्या समस्या.

आधुनिक वैद्यकशास्त्रात या समस्यांसाठी लक्षणांवर आधारित उपचार (symptomatic treatment) केले जातात, परंतु आयुर्वेदात मूळ कारणांचा विचार करून समग्र उपचार केले जातात.

आयुर्वेदानुसार गर्भधारणेसाठी आवश्यक घटक

आयुर्वेदानुसार, गर्भधारणेसाठी खालील चार घटक आवश्यक आहेत:

ध्रुवं चतुर्णां सान्निध्याद्गर्भः: स्याद्विधिपूर्वकः: । ऋतुक्षेत्राम्यु बीजानां सामाज्यादडूकुरो यथा ।।
(सु.शा २/२५)

१. ऋतु (योग्य काळ)

  • गर्भधारणेसाठी सुयोग्य काळ हा मासिक रज:स्त्रावानंतरचा १० वा ते १८ वा दिवस असतो. या काळात स्त्रीला “ऋतुमती” म्हणतात.
  • या काळात मैथुन कर्म केल्यास गर्भधारणेची शक्यता वाढते.

२. क्षेत्र (गर्भाशय)

  • गर्भाशय, बीजवाहिन्या, आणि बीजकोष यांचा समावेश “क्षेत्र” मध्ये होतो.
  • यापैकी कोणत्याही अवयवात दोष असल्यास गर्भधारणा होऊ शकत नाही.
  • गर्भाशयाच्या अंत:कलेचे पोषण आणि अवयवांची उत्तम स्थिती आवश्यक आहे.

३. अंबु (पोषक द्रव्य)

  • गर्भाशय आणि गर्भाच्या पोषणासाठी आवश्यक घटक म्हणजे “अंबु”.
  • आधुनिक वैद्यकानुसार, इस्ट्रोजिन, प्रोजेस्टेरॉन, आणि प्रोलॅक्टिन यांसारख्या संप्रेरकांचा समतोल यात अभिप्रेत आहे.
  • संप्रेरकांचे संतुलन गर्भधारणा, गर्भपोषण, आणि रजोनिवृत्तीसाठी आवश्यक आहे.

४. बीज (स्त्री आणि पुरुष बीज)

  • स्त्रीबीज आणि पुरुष बीज निरोगी असणे आवश्यक आहे.
  • दर महिन्याला एक स्त्रीबीज परिपक्व होते, आणि त्याचे पुरुष बीजाशी मीलन झाल्यास गर्भधारणा होते.
  • दोषरहित बीजांमुळे निरोगी आणि सुदृढ बालक जन्माला येते.

वंध्यत्वाची प्रमुख कारणे (आधुनिक दृष्टिकोन)

आधुनिक वैद्यकशास्त्रानुसार, खालील कारणे स्त्री वंध्यत्वाला कारणीभूत ठरतात:

  • अनियमित रज:स्त्राव (Irregular Menstruation): मासिक पाळी अनियमित असणे किंवा पूर्णपणे बंद होणे (Amenorrhea).
  • स्त्रीबीज परिपक्व न होणे (Anovulatory Cycle): बीजकोषात बीज तयार न होणे.
  • पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम (PCOS): बीजकोषात अनेक अपरिपक्व बीज तयार होणे.
  • गर्भाशयातील ग्रंथी (Uterine Fibroids): गर्भाशयात गाठी निर्माण होणे.
  • बीजवाहिनी अवरोध (Fallopian Tubal Block): बीजवाहिनीत अडथळा येणे.
  • एंडोमेट्रिओसिस (Endometriosis): गर्भाशयाच्या अंतस्तराचा असामान्य वाढ.
  • संप्रेरक असंतुलन (Hormonal Imbalance): AMH, FSH, LH, आणि TSH यांसारख्या संप्रेरकांचे असंतुलन.
  • वंक्षणभागातील शोथ (Pelvic Inflammatory Disease): बीजवाहिनी आणि गर्भाशयाला शोथ येणे.

आयुर्वेदिक उपचार पद्धती

आयुर्वेदात वंध्यत्वावर उपचार करण्यासाठी मूळ कारणांचा विचार केला जातो. यात शोधन (शुद्धीकरण) आणि शमन (दोष संतुलन) चिकित्सा यांचा समावेश आहे. याशिवाय, आहार, विहार, आणि योगासने यांचे महत्त्व आहे.

वंध्यत्वावर त्वरित उपचार मिळावेत आणि लवकर गर्भधारणा व्हावी यासाठी रूग्ण आधुनिक चिकित्सा घेतात. परंतु वर वर उपचार करून व्याधीचा नाश होत नाही. आधुनिक चिकित्सेत लाक्षणिक चिकित्सा (symptomatic treatment) घेउन व्याधी मात्र तसाच राहतो आणि बरेचसे दुष्परिणाम शरीरावर आणि मनावर घेउनच रूग्ण आयुर्वेद चिकित्सकाकडे येतो.

एकीकडे आधुनिक वैद्यक शास्त्रामध्ये अतिशय प्रगत असे चिकित्सा तंत्रज्ञान विकसित होउन देखील या क्षेत्रामध्ये म्हणावा तितका लाभ सर्व रूग्णांना होताना दिसून येत नाही. म्हणूनच शाश्‍वत अशा आयुर्वेद शास्त्राकडे अतिशय आशेने रूग्ण येतात अशावेळी वंध्यत्वात निघून गेलेला बराचसा बहुमुल्य कालावधी, मूळ व्याधी सोबत नव्याने निर्माण झालेले उपद्रव लक्षण, उदर्क, व्याधीसंकर, बहुदोषावस्था, लीनावस्था, दोषांचे आवरण अशा अनेक अवस्थाचे आव्हान घेवून रूग्ण वैदयाकडे येतो.

वंध्यत्वाच्या चिकित्सेमध्ये केवळ वंध्यत्व संबंधित अवयव व केवळ शुक्रवह/आर्तववह स्त्रोतस यांचाच विचार न करता इतर सर्व निगडीत स्त्रोतस, धातू, दोष शरीरातून स्रवणारे संप्रेरके यांचा देखील विचार करून त्यानुसार चिकित्सा केल्यास यश मिळते. त्यासाठी FSH, LH, Prolaction, T3, T4, TSH, AMH (Hormones) विचार महत्वाचा ठरतो.

चिकित्सा – शोधन, शमन, त्याचबरोबर आहार, विहार, व्यायाम, दिनचर्या, यांचे नियम समजावून सांगितले जातात.

शोधन चिकित्सा (पंचकर्म)

पंचकर्म ही शरीर शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे, जी वंध्यत्वाच्या उपचारात अत्यंत प्रभावी आहे:

  1. वमन: स्त्रीरोगात कफ, वाताची दुष्टी प्राधान्याने असते त्यासाठी वमन पंचकर्म उपयुक्त.
  2. विरेचन: बीजातील पित्तप्रधान दोषदुष्टीसाठी विरेचन पंचकर्म उपयुक्त. रक्ताश्रित पित्त असते. रक्तधातु गर्भधारणा पोषणासाठी महत्वाचा त्यासाठी त्याची शुध्दी ठेवण्यासाठी विरेचन योग्य.
  3. बस्ती: बस्ति ही अपानवायूची प्रधान चिकित्सा. गर्भाशय, अंडाशय इ. अवयव अपानवायूच्या कार्यक्षेत्रात येतात आणि स्त्रीरोगात वातदुष्टी अधिक असते. मात्राबस्ति, निरूहबस्ति, उत्तर बस्ति पंचकर्म उपयुक्त.
  4. नस्य: नाकावाटे घातलेले औषध शृंगाटक मर्मापर्यंत पोहचते व आपले काम करते. गर्भधारणेसाठी आवश्यक असलेली मस्तिष्कातील यंत्रणा संतुलित होऊन स्त्रीबीज निर्मितीसाठी आवश्यक हार्मोन्सचे संतुलन योग्य प्रकारे होते.

नासा हि शिरसो व्दारं –

या न्यायाने गर्भस्थापक/प्रजास्थापक वनस्पतिचा उपयोग यात केल्याने फायदा होतो.

डॉ. नेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचकर्म उपचार

शमन चिकित्सा

मूळ हेतुपर्यत पोचून संप्राप्तीभंग व निदान परिमार्जन केल्याशिवाय यश मिळत नाही. रूग्ण भरपूर डॉक्टर फिरून येतात. भरपूर औषधे घेतलेले असतात. काहींमध्ये पूर्वीच्या हार्मोनयुक्त औषधीच्या अति सेवनामुळे गुण यायला वेळ लागतो. त्यामुळे काही रुग्णांमध्ये औषध न देता काही दिवस अंतर ठेवून चिकित्सा सुरु करावी लागते. कोष्ठातच दोषांची उत्पत्ती होते, म्हणुन कोष्ठ चांगला पाहिजे, तेथूनच सार्वदेहिक दोषाचे पोषण होते. आहार पचनातुन धातुंची उत्पति होते म्हणून कोष्ठाचे आरोग्य चांगले पाहिजे.

  • प्रत्येक रुग्णाची तपासणी करून त्यानुसारच औषधींचा वापर करून दोषांचे संतुलन साधले जाते.
  • रसायन चिकित्सा आणि पाचन चिकित्सा यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

वंध्यत्वासाठी रूग्ण सर्व रिपोर्टस्‌ घेवून दवाखान्यात येतात, त्यांचे रिपोर्ट बघितले असता. यु.एस.जी. रिपोर्ट नॉर्मल असतात. काहींमध्ये पी.सी.ओ.डी. असल्याचे आढळते. एच.एस.जी. मध्ये दोन्हीही (बीजवाहिनी नाडी चांगल्या) दिसतात. पतीचे सर्व  रिपोर्ट नॉर्मल असतात. परंतु AMH चे प्रमाण value below reference level असे आढळते ज्यामुळे बीजवृध्दी होत नव्हती हे फक्त एक कारण आजकाल बऱ्यापैकी आढळते.

AMH (Anti-Mullerian Hormone) आणि आयुर्वेद

वंध्यत्वाच्या चिकित्सेसाठी आजकाल केली जाणारी महत्वाच्या तपासण्यापैकी एक AMH (Anti-Mullerian Harmone) आहे. AMH निर्देशांक वंध्यत्वाच्या रूग्णांमध्ये अत्यंत महत्वाचा मानला जातो. हा निर्देशांक स्त्रियांच्या बीजांड कोशमधील बीजनिर्मितीची क्षमता किती शिल्लक आहे हे निर्देशित करतो. अॅंटिम्युलेरियन हॉर्मोन चे प्रमाण बीजकोशाची प्रजनन क्षमता दर्शविते. पेशीविघातक परमाणुंच्या (Free radicals) आघातामुळे व वाढत्या वयामुळे हे प्रमाण खालावत जाते. १.० नॅनोग्रॅम/मि.ली. हे प्रमाण गर्भधारणेसाठी उत्तम समजले जाते. ०.७ ते ०.९ हे मध्यम व त्यापेक्षा कमी असणे हीन समजले जाते. PCOS विकारात मात्र हे प्रमाण विकृत स्वरुपात वाढलेले दिसते.

AMH हा एक महत्त्वाचा निर्देशांक आहे जो स्त्रीबीज निर्मितीची क्षमता दर्शवितो. कमी AMH असलेल्या रुग्णांमध्ये आयुर्वेदिक उपचार प्रभावी ठरतात.  आधुनिक वैदयक शास्त्रात चिकित्सा करतांना IVF चा पर्याय आहे आणि त्यासह DHEA supplements [Dehydroepiandrosterone], L carnitine यासारख्या औषधींचा वापर केला जातो व त्याचे विपरीत परिणाम शरीरावर व मानसिक स्थितीवर दिसतात. हि चिकित्सा करतांना एकावेळी १० ते १२ बीजांड निर्माण करणारी औषधे दिली जातात. या प्रकारच्या कारणांमुळे बीजकोषावर अतिरिक्‍त ताण पडतो व त्याची बीज निर्मितीची क्षमता कमी होते. परंतु आयुर्वेदात अनेक पर्याय आहेत व त्याद्वारे यशस्वी चिकित्सा केली जाते. त्यासोबत व्यायाम, प्राणायाम, सकारात्मकता याची जोड असेल तर काहीही अशक्य असे रहात नाही. आयुर्वेदाद्वारे AMH निर्देशांक कमी असताना उत्तम गर्भधारणा झालेली आढळते. फक्त विश्‍वास महत्वाचा!

पी.सी.ओ.डी.च्या रूग्णांमध्ये हेच अधिक वाढलेले सापडते कारण तेथे एकापेक्षा अधिक लहान लहान बीज तयार झालेले दिसतात. परंतु गर्भधारणेस योग्य नसतात. ०.३ ते २.१९ या मात्रेमध्ये कमी प्रजननक्षमता असते व ०.२३ पेक्षा AMH मात्रा कमी असल्यास गर्भ राहण्याची शक्‍यता नगण्य असते किंवा तशी शक्‍यता नसतेच असे आधुनिक शास्त्राचे मत आहे. AMH हा फक्त निर्देशांक आहे. व्यक्‍ती तितक्‍या प्रकृती यानुसार बघितले तर बऱ्याचदा वेगवेगळे हेतू असण्याची शक्‍यता असते.

निदानपरिवर्जन केल्याशिवाय चिकित्सा सुरू होत नाही हेच लक्षात ठेवावे. AMH हे किती महत्वाचे आहे आणि त्याचा आयुर्वेदात कसा विचार करायचा हे आपण पाहिलेत परंतु AMH कमी होण्याचे आणखी काही मुख्य कारणे आहेत.

  • वाढते वय
  • सातत्याने अनियमित मासिक पाळी
  • पाळी येण्यासाठी हॉर्मीन्सची औषध घेणे.
  • बीजनिर्मिती होण्यासाठी सातत्याने औषधे घेणे.
  • निसर्गत: एकावेळी एका अंडकोषातुन एकच बीज महिन्याला तयार होते.

आयुर्वेदाद्वारे AMH उपचारामध्ये:

  • आहार नियंत्रण: प्रकृतीनुसार वैद्याने सांगितलेला आहार ठेवावा.
  • ऋतुचर्या आणि दिनचर्या: नियमित जीवनशैली आणि विश्रांती.
  • पंचकर्म: शरीर शुद्धीकरण.
  • रसायन चिकित्सा: बीज निर्मिती क्षमता वाढवण्यासाठी.

पथ्यापथ्य (आहार आणि विहार)

संक्षेपत: क्रियायोगो निदान: परिवर्जनम्‌ ।

चिकित्सा सांगायची असल्यास निदान – हेतूसेवन न करणे ही महत्त्वाची चिकित्सा असते.

त्यामुळे अग्निदुष्टीकर, वातवृद्धीकर आहारविहार टाळणे आवश्यक आहे. आयुर्वेदात पथ्यापथ्यांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. खालील गोष्टी लक्षात ठेवाव्या:

पथ्य

  • प्रकृतीनुसार आहार: वैद्याच्या सल्ल्याने पौष्टिक आणि संतुलित आहार घ्यावा.
  • रज:स्वला परिचर्या: पालन करणे. मासिक पाळी सुरु असतांना या काळामध्ये स्त्रीने विशेषणे पातळ, पचनास हलके असा आहार सेवन करणे अत्यंत आवश्यक असते. शिळे पदार्थांचे सेवन टाळावे उदा. फ्रिजमधील रात्रीपासूनचे तयार पदार्थ – कणिक-भाज्या, बिस्किटे इ, अति तीक्ष्ण, उष्ण, लवण अम्ल रसात्मक, विदाही आहार टाळावा उदा. पापड, पाणीपुरी, चायनीज पदार्थ इ. विरुद्ध अन्नाचे सेवन टाळावे. धावपळ करणे, फार मोठे आवाज ऐकणे व श्रमाची कामे करुं नये. दिवसा झोपणे टाळावे, रात्री जागरण वर्ज्य, अतिव्यायाम टाळावा, जास्तीचा वाहन प्रवास करू नये.
  • योगासने: सूर्यनमस्कार, धनुरासन, भुजंगासन, आणि सर्वांगासन यांसारखी आसने.
  • ध्यान आणि प्राणायाम: मानसिक शांतीसाठी उपयुक्त.
  • सकारात्मकता: सौमनस्य मनाची शांत व समाधानी अवस्था गर्भधारणा होण्यासाठी आवश्यक असते.

अपथ्य

  • अपथ्यकर आहार: तेलकट, मसालेदार, आणि प्रक्रिया केलेले अन्न टाळावे.
  • तणाव आणि नकारात्मकता: चिंता, क्रोध, आणि वादविवाद टाळावे.
  • अति व्यायाम: जास्त शारीरिक श्रम टाळावे.
  • जीन्स आणि घट्ट कपडे: यामुळे रक्ताभिसरणावर परिणाम होतो.

शुद्ध बीज, शुद्ध मन, गर्भ येई सौख्यदान,
आयुर्वेद मार्गदर्शन, निरोगी जीवनाचे वरदान

आयुर्वेद उपचाराचे फायदे

  • दुष्परिणाम रहित उपचार: रासायनिक औषधांचे दुष्परिणाम टाळले जातात.
  • समग्र दृष्टिकोन: शारीरिक, मानसिक, आणि आध्यात्मिक संतुलन
  • दीर्घकालीन लाभ: मूळ कारणांचा उपचार केल्याने शाश्वत परिणाम.
  • AMH वाढवणे: आयुर्वेदिक उपचारांमुळे कमी AMH असलेल्या रुग्णांमध्ये गर्भधारणा शक्य होते.

दोषधातुमल मूलं ही शरीरम्‌ ।

दोष, धातू, मल संतुलित असताना शरीराचे धारण करतात. या न्यायाने दोष, धातू, मल यांची असंतुलित अवस्था झाल्यास त्याचा निश्‍चितपणे AMH सारख्या संप्रेरकावर परिणाम होतो परंतु जर आहार, विहारावरील नियंत्रण, दिनचर्या, ऋतूचर्या पालन, रजस्वला परिचर्या पालन तसेच पाचन चिकित्सा, नियमित पंचकर्माद्वारे शरीर शुद्धी व रसायन चिकित्सा घेतल्यास वाढताना दिसते आयुर्वेदाच्या सिध्दांतानुसार चिकित्सा केल्यास हमखास यश मिळते. परंतु त्यासाठी आधुनिक तपासण्यांची मदत घेतल्यास आपण आयुर्वेदाच्या तत्वांना सोडले असा त्याचा अर्थ होत नाही.

आयुर्वेदात वंध्यत्वाविषयी चिकित्सा सांगितली आहे. आजही त्याचप्रमाणे चिकित्सा केल्यास ते फायदेशीर ठरते असे दिसुन येते. विकृती समजण्यासाठी प्रथम प्राकृत स्थिती काय आहे हे समजणे फार गरजेचे आहे. म्हणजे गर्भ उत्पन्न होण्यास लागणारे घटक कोणते आहेत याची माहिती अवगत करून घेणे नितांत गरजेचे आहे ते पुढीलप्रमाणे –

वंध्यत्वाची कारणे पाहता सर्वात महत्वाचे व मुख्य कारण आहे बीजदुष्टी म्हणजे स्त्रीबीज म्हणजे आधुनिक शास्त्रानुसार साधारणतः ७० ते ८० स्त्रियांमध्ये हाच विकार वंध्यत्वाला कारणीभूत असतो.

जी गर्भाचा प्रसव करते ते स्त्री असे असल्याने गर्भनिर्मिती व प्रसव हा स्त्री जीवनाचा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे या सर्वांशी सामाजिक, कौटुंबिक स्वास्थ्य ही निगडीत आहे. त्यामुळे गर्भनिर्मितीचा मूळ घटक म्हणजे ‘स्त्रीबीज’, ह्यासंबंधी आयुर्वेदशास्त्र आपल्याला काय सांगते. हे महत्त्वाचे आहे.

शुद्धबीजापोटी फळे रसाळ गोमटी ।

अशा सारख्या सुभाषित किंवा सुवचनांमधून बीजाचे महत्त्व आपल्याला कळते. स्त्री बीज व पुरुषबीज हे गर्भाचे समवायि कारण तर त्यांचा संयोग हे असमवायि कारण आहे. ‘प्रजासंपत्‌’ निर्माण होण्यासाठी उत्तम प्रतीचे स्त्री बीज व पुरुष बीज आवश्यक आहे.

स्त्री वंध्यत्व ही एक जटिल समस्या आहे, परंतु आयुर्वेदाच्या समग्र दृष्टिकोनामुळे यावर प्रभावी उपचार शक्य आहेत. योग्य आहार, विहार, पंचकर्म, आणि मानसिक शांती यांच्या संयोगाने गर्भधारणा शक्य आहे. आयुर्वेदात विश्वास ठेवून आणि वैद्याच्या मार्गदर्शनाखाली उपचार केल्यास सुदृढ आणि निरोगी बालक जन्माला येऊ शकते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *