मलावष्टंभ – पोट साफ न होणे

पोट साफ न होणे

मलावष्टंभ – पोट साफ न होणे हा उपद्रव मनुष्यांतच फार आढळतो. इतर प्राण्यांत कमी असतो. याचे कारण इतर प्राणी वेळच्या वेळी मलविसर्जन करितात. पण मनुष्यप्राणी मलविसर्जनाची हयगय करितो. जेव्हां निकडच लागेल तेव्हा मात्र इलाज चालत नाही.
वेग येताच मलोत्सर्ग झाल्यास मग तक्रारच नाही, पण तो गुदाच्यावरच्या भागावर कोंडून ठेविला म्हणजे त्याचे वटक बनतात व त्यामुळे वायूची गती ऊर्ध्व होते. म्हणून दुसरे दिवशी व्हावी तशी मलशुद्धी होत नाही. अशामुळे आतडी कमजोर होते व मलावरोध जास्तच वाढतो व मळ जास्त दिवस राहिल्याने अधीक घट्ट होतो. यामुळे पोट साफ करणारी औषध घेतल्याशिवाय होतच नाही आणि त्यामुळे मुळव्याध, संग्रहणी, ज्वर, उदर व इतर अनेक रोगास कारण होते. याकरिता पोट साफ होण्याची वेळ चुकवुच नये.

आनाह रोग २ प्रकारचा आहे – एक पक्वाशयात होऊन पोट फुगवितो व दुसरा आमाशयात होतो त्याला प्रत्यानाह असे म्हणतात.
आनाहाचे लक्षण
आम किवा मल फार दिवस साचून वायुने वारंवार विबद्ध होऊन. स्वमार्गाने चांगले निसःरण होत नाहीत.
आमापासून झालेल्या आनाहामध्ये सर्दी, डोकेदुखी, पोटदुखी, जडपणा, हृदय अडकल्यासारखे होणे, सतत ढेकरा येणे, कंबरपाठदुखी, मल आणि मुत्र यांचा अवरोध, चक्कर येणे, उलटी येणे व श्वास ही लक्षणे होतात. पक्वाशयात आनाह झाला असता आळस व बाकी लक्षणे ही होतात.
आनाहाचे कारण व विचार –
पित्त प्रमाणात असणे हे आरोग्यास हितकर आहे. त्यामुळे अन्नपचनाला चांगली मदत होते. पित्ताच्या अंगी क्षार धर्म असल्यामुळे लहान आतड्यांतील रसाची क्रिया सुरळीत चालते. पित्तापासून आतडाच्या नळीचा संकोच व प्रसार हा व्यापार चांगला होऊन अन्न पुढे पुढे ढकलत जाऊन पचन पावते व त्या सारभागातील द्रव रक्‍तात मिसळून चोथा साफ निघुन जातो. याचे कारण पित्तच आहे.
आपण जे काही खातो त्याचे पचन होत असता त्यातील त्याज्य भाग बाहेर निघून जाण्याकरिता देहाला जे मार्ग केले आहेत, त्यांतून तो वेळच्या वेळी निघून जावा अंशी नैसगिक योजना असते व ही योजना जोपर्यंत सुरळीत चालते तोपर्यंत मनुष्याची प्रकृती कधीही बिघडत नाही व त्यास अडथळा होऊ लागला म्हणजे प्रकृतीत बिघाड होते.
“ रोगाः सर्वे$पि जायंते वेगोदीरण धारणे: ” सर्व प्रकारचे रोग मलमूत्रादिकांच्या अवरोधाने किवा मुद्दाम अडविल्यानेही उत्पन्न होतात. अशा प्रकारे पचनक्रियेपासून उत्पन्न होणारा जो मल तो स्वमार्गाने बाहेर पडण्याच्या कामी जो अडथळा येतो त्याला बद्धकोष्ठ म्हणतात.
आपण खाल्लेल्या अन्नाचे अन्नपचन होऊन त्याचा पाचक रस होण्यास अंदाजे १२ ते १५ तासं लागतात. इतक्या अवधीत आणखी वरचेवर खाण्याने व त्यायोगाने वरचेवर उत्पन्न होणाऱ्या मलाने मलमार्ग गच्च भरून कोंदून राहातो. यामुळे मागील आलेला मल तसाच शिल्लक राहतो तो व्यवस्थीतपणे बाहेर पडत नाही. यामुळे तो मल त्या ठिकाणी साचुन कुजुन दुर्गंधी व रोगनिर्माण करणारे जंतु उत्पन्न करितो, यांमुळे आतड्यांचा संकोच, पोट फुगणे, आळस, डोकेदुखी, मान दुखणे, चक्कर येणे, कंप, भुक न लागणे, तोंडाची चव जाणे, अग्निमांद्य हे विकार उत्पन्न होतात.

कारणे –

चुकीचे खाणे, जेवल्यावर झोपणे, वेळच्या वेळी शौचास न जाणे, पाचकपित्ताची कमतरता, आतडी व पक्‍वाशय यांची कार्यक्षमता कमी असणे व पक्वाशयातील बिघाडाने पचनक्रियेत बिघाड होते. बहुतेक बद्धकोष्ठत्वाचे त्रास असणाऱ्या लोक पोट साफ होण्याकरिता सारक औषधे घेतात. पण त्यांना त्यापासून कांही उपयोग होत नाही. कारण ज्या दिवशी औषध घेतले त्या दिवशी मात्र शौचास साफ होते. कित्येकांस ८ ते१५ दिवसांनी सारक घेण्याची सवयच लागलेली असते. पण ही सवय फार वाईट आहे. कारण पोट साफ करणाऱ्या औषधाने पोट साफ करत गेल्याने आतड्यांचा पोट साफ करणाच्या स्वाभाविक गुण नष्ट होतो व सारक औषध घेतल्याशिवाय पोट साफच होत नाही, कारण वरचेवर पोट साफ करणारी औषध घेतल्याने आतड्यांना त्रास होतो व ती अधीक शिथिल होतात, आतड्यांमधील स्निग्धत्व जाऊन रुक्षपणा येतो. अशी सतत पोट साफ करणारी औषधे घेण्यापेक्षा यकृताचे कार्य सुररीत ठेवणे व बस्ती घेणे कधीपण उत्तम आहे. बस्तीमुळे आतड्यांना बल, स्निग्धता मिळुन चांगला गुण येतो.
उपाय :-
  • युक्‍तरथ बस्ती घेतला असता आनाह दूर होतो.
  • मनुका व त्याच्या दुप्पट हिरडे कुटून १० ग्रामची वजनाची गोळी करून कोमट पाण्यासह रात्री घ्यावी.
  • मलावष्टंभास-ओवा व बीडखार ताकात, बाळहिरडे, सुंठ, मीठ, यांचे चुर्ण ताकातून प्यावे.

मलावष्टंभावर पथ्य :-

विरेचन, वमन, जुन्या साळीचा भात, मुग, मसुर, तुरीचे वरण, साजुक तुप, गव्हाची पोळी, यव, करटोळी, पडवळ, कोबी, घोळ, चाकवत, दोडके, घोसाळी, वांग्याचे भरीत, तिळाचे तेल, उकलेले  पाणी, शेळीचे लोणी, तवकीर, लसूण, मोहरी, काजू, ताक, एरंडेल, ब्राह्मी, मध, गोमूत्र, जोंधळ्याची भाकर इ. पथ्य समजावे.

वैद्य. हर्षल नेमाडे
वेदाकेअर आयुर्वेद
9175069155

वेदाकेअर हे औंध पुण्यातील एक विश्वासार्ह आयुर्वेदिक चिकित्सालय आहे. जे सर्वोत्तम आयुर्वेदिक उपचार देते. वेदाकेअर औंध पुणे येथे सर्वोत्तम आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घ्या.

संपर्क

9175069155
9028191155

वेळ

सोम -शनी
10.00-14.00
17.00-20.00

पत्ता

ऑफिस नं-१, साहिल अपार्टमेंट, जयहिंद समोर, आयटीआय रोड, परिहार चौक, औंध, पुणे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Exit mobile version